E-Paper

बालकांवरील लैंगिक अत्याचाराबाबत मौन घातक, निर्भीड तक्रारीतूनच न्याय मिळतो — न्यायाधीश अतुल ए. उत्पात

कराड

बालकांवरील लैंगिक अत्याचाराबाबत मौन घातक, निर्भीड तक्रारीतूनच न्याय मिळतो — न्यायाधीश अतुल ए. उत्पात

कराड प्रतिनिधी :- याबाबत अधिक माहिती अशी की  बालकांवरील लैंगिक अत्याचाराच्या घटनांबाबत मौन बाळगणे अत्यंत घातक असून भीती, लाज किंवा सामाजिक दबावामुळे तक्रार न करणे हीच गुन्हेगारी प्रवृत्तीला बळ देणारी बाब आहे. त्यामुळे अन्यायाविरुद्ध निर्भीडपणे आवाज उठविल्यासच न्याय मिळू शकतो, असे प्रतिपादन कराड येथील न्यायाधीश अतुल ए. उत्पात यांनी केले.

जागतिक युवा दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या निर्देशानुसार तसेच प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सातारा ए. एस. वाघमारे, जिल्हा व सत्र न्यायाधीश–१ तथा अध्यक्ष, तालुका विधी सेवा समिती, कराड यु. एल. जोशी आणि सचिव एन. एन. बेदरकर यांच्या मार्गदर्शनाखाली रयत शिक्षण संस्थेच्या यशवंत हायस्कूल, कराड येथे तालुका विधी सेवा समिती, कराड व विधिज्ञ संघ, कराड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भव्य विधी साक्षरता शिबिरात ते बोलत होते. यावेळी कराड वकील संघटनेचे अध्यक्ष दीपक थोरात, ज्येष्ठ विधिज्ञ रवींद्र पवार, अ‍ॅड. भारत मोहिते, अ‍ॅड. सत्यजित पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.

न्यायाधीश उत्पात पुढे म्हणाले की, बालके हे मजबूत राष्ट्राचे भविष्य असून त्यांचे संरक्षण ही काळाची गरज आहे. बालकांच्या हक्कांचे व अधिकारांचे रक्षण करणे हे समाजाचे परम कर्तव्य आहे. यावेळी त्यांनी लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कायदा पॉक्सो अंतर्गत बालकांना दिलेले संरक्षण, तक्रार नोंदविण्याची प्रक्रिया, पोलीस यंत्रणा, चाइल्ड हेल्पलाईन १०९८ तसेच न्यायालयीन यंत्रणांची भूमिका याबाबत विद्यार्थ्यांना सोप्या व समजेल अशा भाषेत सविस्तर माहिती दिली.

कार्यक्रमात रॅगिंगचे दुष्परिणाम व त्यावरील कायदेशीर तरतुदी, बाल विवाहाचे सामाजिक व कायदेशीर परिणाम तसेच वाहन चालविताना वाहतूक नियमांचे पालन करण्याचे महत्त्व याबाबतही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. कायद्याचे ज्ञान युवकांपर्यंत पोहोचणे अत्यावश्यक असून त्यातूनच सजग, जबाबदार व कायद्याचे पालन करणारे नागरिक घडू शकतात, असे मत न्यायाधीश उत्पात यांनी व्यक्त केले.

यावेळी अ‍ॅड. भारत मोहिते यांनी स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या विचारांवर आधारित मार्गदर्शन करत युवकांना प्रेरणा दिली. शिबिरास शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, विधिज्ञ संघाचे सदस्य, विधी सेवा समितीचे प्रतिनिधी राजेंद्र भोपते, पी. यू. कांबळे तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना मार्गदर्शकांनी समर्पक उत्तरे देत त्यांच्या शंका दूर केल्या.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल आयोजकांचे कौतुक करण्यात आले. अशा प्रकारच्या विधी साक्षरता उपक्रमांमुळे कायद्याबाबत जनजागृती वाढून एक सजग व कायद्याचे पालन करणारी पिढी घडण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

पत्रकारांना पोक्सो कायद्याबाबत जनजागृतीचे आवाहन

बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी पॉक्सो कायदा प्रभावीपणे अंमलात आणणे अत्यंत गरजेचे आहे. या कायद्याबाबत समाजात योग्य आणि अचूक माहिती पोहोचविण्यात पत्रकारांची भूमिका महत्त्वाची आहे 

पत्रकारांनी पॉक्सो कायद्याच्या तरतुदी, गुन्ह्यांचे स्वरूप, शिक्षा आणि पीडित बालकांच्या गोपनीयतेचे महत्त्व याबाबत संवेदनशीलता बाळगावी. बातमी प्रसिद्ध करताना कायद्याच्या चौकटीत राहून, समाजप्रबोधन होईल अशा पद्धतीने वृत्तांकन करावे, असे आवाहन त्यांनी उपस्थित पत्रकाराना केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!