E-Paper

शासनाच्या विविध योजना प्रभावीपणे राबवण्यात कराड आघाडीवर आ. अतुलबाबा भोसले 

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान

शासनाच्या विविध योजना प्रभावीपणे राबवण्यात कराड आघाडीवर आ. अतुलबाबा भोसले 

कराड, प्रतिनिधी ता. १२ :  याबाबत अधिक माहिती अशी की  छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियानाच्या माध्यमातून प्रशासन अधिकाधिक लोकाभिमुख करण्याचा आमचा प्रयत्न आहे. शासनाच्या विविध योजना प्रभावीपणे राबविण्यात कराड आघाडीवर असून, याचा मला अभिमान आहे, असे प्रतिपादन कराड दक्षिणचे आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी केले. 

राज्याचे मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्या जन्मदिनानिमित्त व माजी उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र शासनाच्यावतीने कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघ अंतर्गत विंग (ता. कराड) येथे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराच्या उद्‌घाटन सोहळ्यात ते बोलत होते. 

व्यासपीठावर अप्पर जिल्हाधिकारी विठ्ठल इनामदार, प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे, तहसीलदार कल्पना ढवळे, उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील, उपनिबंधक अपर्णा यादव, जिल्हा परिषद सदस्य शैलजा शिंदे, प्रियांका साळुंखे, पंचायत समिती सभापती नंदाताई यादव, पंचायत समिती सदस्य अर्जुन कराळे, दादासाहेब मरगळे, वर्षा निकम, माधवी पाटसुपे, गोविंद गावडे, यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे संचालक आनंदा खबाले, छबन कांबळे, मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजनेचे सहअध्यक्ष प्रमोद पाटील, कराडचे मुख्याधिकारी प्रशांत व्हटकर, मलकापूरचे मुख्याधिकारी कपिल जगताप, सरपंच दिपाली पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. 

यावेळी बोलताना आ.डॉ. भोसले म्हणाले, की शासनाच्या माध्यमातून शेतकरी, महिला, युवक आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी विविध कल्याणकारी योजना राबविल्या जात आहेत. या योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रशासनाने अधिक गतिमान आणि लोकाभिमुख पद्धतीने काम करणे आवश्यक आहे. नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी कार्यालयांच्या वारंवार फेऱ्या माराव्या लागू नयेत, यासाठी अशा समाधान शिबिरांची भूमिका महत्त्वाची आहे. कराड तालुक्यातील सर्व विभाग चांगल्या पद्धतीने काम करीत असून, शासनाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी होत आहे. एस.आय.आर. मोहिमेतही प्रशासनाने चांगली कामगिरी केली आहे. 

अप्पर जिल्हाधिकारी विठ्ठल इनामदार म्हणाले, या अभियानाच्या माध्यमातून राज्यातील १० लाख लोकांना शासनाच्या योजनांचा लाभ देण्याचा आमचा मनोदय आहे. यामध्ये आपल्या जिल्ह्यातील लाभार्थ्यांचे प्रमाण जास्तीत जास्त राहील यासाठी व शेवटच्या पात्र व्यक्तीपर्यंत शासनाच्या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत. 

या शिबिराच्या माध्यमातून विविध शासकीय योजनांची माहिती नागरिकांना देण्यात आली. तसेच विविध लाभार्थ्यांना १,६५० दाखल्यांचे वितरण केले जाणार आहे. कार्यक्रमाला निवासी नायब तहसीलदार बाबुराव राठोड, नायब तहसीलदार महेश उभारे, संजय गांधी निराधार योजना अधिकारी बाजीराव पाटील, पुरवठा अधिकारी साहिला नायकवडी, कृष्णा कारखान्याचे माजी संचालक बबनराव शिंदे, सयाजी यादव, माजी जि. प. सदस्य शंकरराव खबाले, धीरज गांधी, सचिन पाचुपते, नितीन थोरात यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

विंग : महाराष्ट्र शासनाच्यावतीने आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर फोटो 👇👇👇👇

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!